विंचूरचे सुपुत्र सुनील क्षीरसागर यांना राज्यस्तरीय ‘अक्षराज लोकविश्वास पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर
१४ ऑगस्ट रोजी पुणे येथे भव्य सोहळ्यात होणार सन्मान
न्यायभूमी
विंचूर दि.१२ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी):
आपल्या आक्रमक आणि अभ्यासू पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य, वंचित व उपेक्षित समाजघटकांना न्याय मिळवून देणारे विंचूर येथील भूमिपुत्र सुनील क्षीरसागर यांना दैनिक ‘अक्षराज’ समूहाचा अत्यंत मानाचा “अक्षराज लोकविश्वास पत्रकारिता पुरस्कार” जाहीर झाला आहे.
दैनिक अक्षराज समूहाचे संस्थापक-संपादक विनोद गोरे आणि सहसंपादक प्राजक्ता गोरे यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली.
येत्या १४ ऑगस्ट रोजी पुणे येथे आयोजित एका विशेष राज्यस्तरीय सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
सुनील क्षीरसागर यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना नेहमीच सामाजिक बांधीलकी जपत प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि सखोल अभ्यासाच्या जोरावर बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. केवळ प्रश्न मांडणे एवढाच उद्देश न ठेवता, प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून अड अडचणीत सापडलेल्या नागरिकांना, शेतकरी व गरजूंना प्रत्यक्ष न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केले आहे.
अनेक गुंतागुंतीचे आणि प्रलंबित सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे.
त्यांच्या याच निष्पक्ष, निर्भीड आणि जनहितैषी पत्रकारितेची दखल घेत अक्षराज परिवाराच्या वतीने या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या कार्याची यथोचित पावती देण्यात आली आहे.
या पुरस्काराची घोषणा होताच विंचूर परिसरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून आणि पत्रकारिता क्षेत्रातून सुनील क्षीरसागर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

