नांदगावमध्ये बिबट्याचा थरार;विहिरीत अडकलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०३ जुलै अभय पाटील
निफाड तालुक्यातील नांदगाव शिवारात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली.
शेतकरी विजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले असून, वनविभागाच्या तत्परतेमुळे सदर बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.
प्राथमिक माहितीनुसार,सदर बिबट्या पहाटेच्या सुमारास पाण्याच्या शोधात विहिरीकडे गेला असावा. पाय घसरून विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी तातडीने वनविभागाला याबाबत माहिती दिली.
वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यू पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले.संपूर्ण परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्यानंतर सुटकेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर,अत्यंत काळजीपूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. बिबट्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नसून,त्याला आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
उपचारानंतर त्याला मूळ अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
दरम्यान,या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळले जात आहे.गेल्या काही महिन्यांपासून निफाड तालुक्यात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांनी वनविभागाकडे या परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली असून,मानवी वस्त्या व जंगल यामधील सीमारेषा झपाट्याने कमी होत असल्याचे वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षणा सोबतच लोकसहभाग,सजगता व जनजागृती अत्यावश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.