कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात; नाफेड, एनसीसीएफची खरेदी संथ गतीने सुरू असल्याबद्दल पत्राद्वारे व्यक्त केली चिंता
दिल्ली बैठकीतील निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करा; खासदार भास्करराव भगरे यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी
न्यायभूमी
विंचूर दि.३० मे मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून,दिल्ली येथे कांदा प्रश्नावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतील निर्णय व आश्वासनांची केंद्र सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी.
अशी मागणी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
उत्पादन खर्चही निघणे कठीण
खासदार भगरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की,नाशिक,कळवण,देवळा,दिंडोरी, निफाड,चांदवड,येवला,सिन्नर या प्रमुख तालुक्यांसह राज्यातील इतर भागांतील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत.
बियाणे, खते, कीटकनाशके,मजुरी,डिझेल,वीज व वाहतूक खर्चामध्ये सातत्याने प्रचंड वाढ होत आहे.
त्या तुलनेत कांद्याला मिळणारा बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यासमोर उदरवाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
खरेदी प्रक्रिया अत्यंत संथ
दिल्ली येथे झालेल्या बैठकीत कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी नाफेड (NAFED) व एनसीसीएफ (NCCF) मार्फत मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करणे, बफर स्टॉक वाढविणे,कांदा निर्यातीस प्रोत्साहन देणे.
भावांतर भरपाई योजना लागू करणे, विशेष आर्थिक पॅकेज देणे, अतिरिक्त खरेदी केंद्रे सुरू करणे आणि दीर्घकालीन राष्ट्रीय कांदा धोरण तयार करणे यासारख्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा झाली होती.
या सर्व बाबींवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती.मात्र,प्रत्यक्ष मैदानावर परिस्थिती वेगळी असून खरेदी प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याकडे खासदार भगरे यांनी लक्ष वेधले आहे.
खासदार भास्करराव भगरे यांच्या प्रमुख मागण्या:
थेट बाजार समित्यांमध्ये खरेदी: खरेदी प्रक्रियेतील किचकट अटी व तांत्रिक अडचणी दूर करून नाफेड व एनसीसीएफमार्फत थेट बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी तातडीने सुरू करावी.
स्थिर निर्यात धोरण: कांदा निर्यात धोरण स्थिर व शेतकरीहिताचे ठेवून निर्यातीवरील अनिश्चितता दूर करावी. अतिरिक्त उत्पादनाच्या काळात निर्यातीला विशेष चालना द्यावी.
बियाणे निर्यातीवर कर वाढवा: कांदा बियाणे मोठ्या प्रमाणात इतर देशांत निर्यात होत असल्यामुळे तिथे कांदा लागवड वाढून भारतीय कांद्याची मागणी कमी होत आहे. त्यामुळे देशांतर्गत हित जपण्यासाठी निर्यातक्षम बियाण्यावर निर्यात कर वाढवावा.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्या!
“जाहीर करण्यात आलेल्या खरेदी उद्दिष्टांच्या तुलनेत प्रत्यक्ष खरेदी अत्यल्प प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दिल्ली येथील बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावी आणि केंद्राने प्रभावी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा.”— खासदार भास्करराव भगरे


