जंतर मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ सटाणा बंद; विविध पक्ष-संघटनांचा सहभाग

न्यायभूमी
सटाणा दि.२३ जुलै
दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब (ॲड. प्रकाश) आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत सटाणा शहरात विविध समविचारी पक्ष व संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला.
बंदची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील व्यापारी बांधवांना शांततापूर्ण पद्धतीने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव दादा खरे यांनी सांगितले की, श्रद्धेय बाळासाहेब (ॲड. प्रकाश) आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत सटाणा शहरातील व्यापारी वर्गाला आवाहन करण्यात आले. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनावर करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत,तसेच जखमी आंदोलकांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच देविदास सोनवणे यांनी ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.शासनाच्या बेजबाबदार पणामुळे शांततामय आंदोलनाला हिंसक वळण देत एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला हे अत्यंत घृणास्पद आहे याचा मी जाहीर निषेध करतो असे सांगितले.
यानंतर कार्यकर्त्यांनी सटाणा शहरातील मुख्य मार्गावरून घोषणाबाजी करत मोर्चा काढला. तहसील कार्यालयात तहसीलदार कैलास चावडे तसेच पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देविदास सोनवणे,माजी तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, महिला अध्यक्षा सुरेखा बच्छाव,युवा अध्यक्ष चेतन वणीस,शहराध्यक्ष मयुर वाघ, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष रवींद्र सोनवणे, प्रकाश बच्छाव, काँग्रेस किसान सेलचे रवी पवार, काँग्रेसचे संजय गरुड,वंचित बहुजन आघाडीचे निलेश देवरे,कैलास आहिरे,राजेंद्र महिरे,संदीप म्हसदे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



