न्यायभूमी दि.०९ सप्टेंबर विंचूर (विशेष प्रतिनिधी) सुनील क्षीरसागर
निफाड तालुका व परिसरात पितृपक्षाला सुरुवात होताच घराघरांत धार्मिक वातावरण दिसून येत आहे.हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा हा काळ मानला जातो.श्रावण संपताच भाद्रपदातील पौर्णिमेनंतर पंधरवडाभर हा पितृपक्ष येतो.
या काळात प्रत्येक हिंदू कुटुंब आपल्या पितरांना स्मरते, त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध विधी, तर्पण, पिंडदान व दानधर्म केला जातो.
पितृपक्षातील प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व मानले जाते.या काळात लोक सकाळी लवकर उठून स्नान करून श्राद्ध विधी करतात. शिजवलेले अन्न प्रथम कावळ्याला अर्पण करण्याची जुनी परंपरा आजही कायम आहे. कावळा हा पितरांचा दूत आहे.
अशी श्रद्धा असल्याने घरातील नैवेद्य,पिंड किंवा तर्पणातील अन्न त्याला अर्पण केले जाते. कावळा ते अन्न स्वीकारतो म्हणजे पितर तृप्त झाले,असे मानले जाते.
गावोगावी पितृपक्षात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.अनेक कुटुंबे गंगा,गोदावरी,नर्मदा अशा पवित्र नद्यांच्या घाटावर जाऊन पिंडदान करतात.
काहीजण आपल्या घरीच पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली विधी पार पाडतात.
यावेळी ब्राह्मणांना व गरजू गरिबांना भोजन देणे, वस्त्रदान करणे,धान्यदान करणे या दानधर्मालाही मोठे महत्त्व आहे.
धर्मशास्त्रानुसार पितरांचे ऋण फेडण्यासाठी हा काळ अत्यावश्यक मानला गेला आहे.आई-वडील,आजी-आजोबा तसेच पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पंधरवडा असतो.
पितृपक्षात पितरांना प्रसन्न केल्यास घरात समृद्धी,शांती व समाधान नांदते, अशी लोकश्रद्धा आहे.

आजच्या आधुनिक युगात अनेक ठिकाणी या परंपरा साध्या पद्धतीने पार पाडल्या जात असल्या तरीही “पितृपक्ष आला म्हणजे कावळ्याला अन्न देणे अनिवार्य आहे”ही भावना अजूनही प्रत्येकाच्या मनात दृढ आहे.
त्यामुळे पितृपक्षाचा पंधरवडा हा श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा काळ ठरतो.



