अतिदुर्गम चिचपाणीपाडा जिल्हा परिषद शाळेत ‘शिरपूर फर्स्ट’चा अभिनव उपक्रम;
शैक्षणिक साहित्य वाटप अन् वृक्षारोपण!

न्यायभूमी दि.२४ जुलै
शिरपूर दुर्गम भागात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत ‘शिरपूर फर्स्ट’ सामाजिक संघटनेने आपला तिसरा वर्धापन दिन अनोख्या व स्तुत्य उपक्रमाने साजरा केला.
अनेर अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम चिचपाणीपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने शाळा परिसरात उत्साहात वृक्षारोपणही करण्यात आले.
दोन दशकांपासून झोपडीतच भरतेय ‘शिक्षणाची शाळा’
अनेर अभयारण्य परिसरात वसलेली चिचपाणीपाडा येथील जिल्हा परिषद शाळा सन २००२ मध्ये सुरू झाली.मात्र,अभयारण्य क्षेत्रातील कडक नियमांमुळे व तांत्रिक अडचणींमुळे गेल्या २४ वर्षांत या शाळेला पक्की इमारत मिळू शकलेली नाही. परिणामी, येथील चिमुकल्यांना आजही एका झोपडीसदृश तात्पुरत्या जागेतच बसून शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव असतानाही या शाळेत तब्बल ३० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांची उपस्थिती १०० टक्के आहे, ही बाब कौतुकास्पद ठरते.
शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
या सर्व अडचणींची दखल घेत ‘शिरपूर फर्स्ट’च्या कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनाचे औचित्य साधून या दुर्गम पाड्यावर धाव घेतली. विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ऐन पावसाळ्यात शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. याप्रसंगी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली.
प्रशासनाने व समाजाने पुढे येण्याची गरज
या उपक्रमाबाबत बोलताना ‘शिरपूर फर्स्ट’चे अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर भर दिला.
या कार्यक्रमास ‘शिरपूर फर्स्ट’चे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘शिरपूर फर्स्ट’च्या या संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हेच आमच्या संघटनेचे मुख्य ध्येय आहे.
चिचपाणीपाडा शाळेत ३० विद्यार्थी असून त्यांची उपस्थिती १००% आहे, ही मोठी गोष्ट आहे.
मात्र, आजही मुले झोपडीत शिकत आहेत, ही खंत आहे. शिक्षण विभागाने या शाळेकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
केवळ राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठोस काम (विधेयक काम) केले पाहिजे.



