शाळेमागील शेतात बिबट्याचे दर्शन; संरक्षण भिंत नसल्याने पालकांमध्ये संताप
कृष्णवाडीत दिवसाढवळ्या बिबट्याचा थरार; झेड.पी.शाळेच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!

न्यायभूमी

विचूर दि. ०१ जानेवारी २०२६सु नील क्षिरसागर
_”हा खेळ बिबट्याचा.. रात्रीस आणि आता दिवसा खेळ चाले..संपणार ना कधी हा खेळ बिबट्याचा?”_
असा उद्विग्न सवाल सध्या निफाड तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. कृष्णवाडी येथे काल दुपारी चक्क शाळेच्या आवाराजवळच बिबट्याचे दर्शन झाल्याने पालकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
—————————
नेमकी घटना काय?
निफाड तालुक्यातील कृष्णवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात काल (दि.२९ डिसेंबर) साधारण दुपारी १:०० वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
शाळेच्या इमारतीला लागूनच मागील बाजूस मका आणि डाळिंबाची घनदाट बाग आहे. दुपारच्या सत्रात शाळा सुरू असताना अचानक शाळेच्या मागील बाजूस बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला.
या आवाजाने शिक्षक क्षिरसागर व केंद्रे आणि विद्यार्थी सतर्क झाले.खिडकीतून आणि सुरक्षित अंतरावरून पाहिले असता,एका कुत्र्यावर बिबट्यानी हल्ला केल्याचे ग्रामस्थ व शिक्षक यांच्या निदर्शनास आले.आणि नंतर मक्याच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याचे शिक्षक व काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दिसून आले.

दिवसाढवळ्या शाळेच्या अगदी जवळ बिबट्या दिसल्याने विद्यार्थी भयभीत झाले असून, शाळेच्या आवारात भीतीचे वातावरण पसरले आहे.
संरक्षण भिंतीचा अभाव: विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
सर्वात चिंतेची बाब म्हणजे,येथील जिल्हा परिषद शाळेला मागील बाजूस कोणतीही संरक्षण भिंत नाही. शाळेचे मैदान आणि शेतकऱ्यांची उभी पिके (मका व डाळिंब) यामध्ये कोणताही अडथळा नसल्याने,शेतात लपलेला बिबट्या सहज शाळेच्या आवारात येऊ शकतो.
या असुरक्षिततेमुळे “शाळा शिकावी की जीव वाचवावा?” असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.

घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली. “रात्रीचा धुमाकूळ आता दिवसावर आला आहे, प्रशासनाला एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का?” असा संताप व्यक्त केला जात आहे.
—————————-
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
१. वन विभागाने तातडीने या भागात पिंजरा लावावा.
२. जिल्हा परिषद प्रशासन व ग्रामपंचायतीने शाळेच्या मागील बाजूस तात्काळ संरक्षण भिंत बांधावी.
३.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही आणि बिबट्या पकडे पर्यंत परिसरात गस्त वाढवावी.
—————————–
सद्यस्थितीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि बिबट्याचा हा ‘जीवघेणा खेळ’ थांबवावा, अशी आर्त हाक कृष्णवाडीतील ग्रामस्थ देत आहेत.



