बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी पायी वारी करणाऱ्या युवकांचे विंचूर येथे उत्साहात स्वागत
न्यायभूमी न्यूज
न्यायभूमी
विंचूर दि.१५ सप्टेंबर (प्रतिनिधी) : सुनील क्षीरसागर
कन्नड तालुक्यातील आंबा तांड्याचे सचिन चव्हाण व देवचंद राठोड हे बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पायी यात्रा करीत मुंबईकडे प्रस्थान करत आहेत.
या यात्रेचा टप्पा विंचूर येथे आल्यानंतर गावातील नागरिक व सामाजिक संघटनांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे, ही समाजाची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. परंतु शासनाकडून अद्याप याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने समाजातील युवकांनी आरक्षणासाठी पायी यात्रा सुरू केली आहे.
कन्नड तालुक्यातील आंबा तांडा येथून सुरू झालेली ही यात्रा मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पूर्ण होणार आहे.
विंचूरमध्ये प्रवेश करताच नागरिकांनी पुष्पहार घालून व जल्लोषात सचिन आणि देवचंद राठोड यांचे स्वागत केले.
स्वागत सोहळ्यात स्थानिक युवक, ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन राठोड म्हणाले, “आरक्षण हा आमचा हक्क आहे. शासनाने तातडीने समाजाच्या मागणीवर तोडगा काढावा. महाराष्ट्रातील बंजारा समाजाला न्याय मिळेपर्यंत आमची ही पायी यात्रा सुरू राहील.”
देवचंद राठोड यांनी सांगितले की,“आमचा समाज वंचित व उपेक्षित आहे. शासनाने तातडीने समाजाचा इतिहास व सामाजिक स्थिती विचारात घेऊन अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा. अन्यथा आमचा लढा अधिक तीव्र होईल.”
या स्वागतप्रसंगी विंचूर शहरातील नागरिकांनीही आपले समर्थन दर्शवले. “समाजाच्या न्याय्य मागणीसाठी युवकांनी पायी यात्रा सुरू करून धाडस दाखवले आहे. त्यांना यश मिळावे, अशीच आमची इच्छा आहे,” असे अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले.

बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी ही यात्रा विंचूरसह अनेक गावांत थांबणार असून ठिकठिकाणी नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.



