विंचूर विद्यालयात वर्धापन दिन साजरा; खासदार भास्करराव भगरे यांचा विद्यार्थ्यांवर स्नेह
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि.०५ऑक्टोबर २०२५ मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर
अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन आज कर्मवीर भाऊराव पाटील विंचूर विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत चाललेल्या शैक्षणिक व सामाजिक क्रांतीला उजागर करणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य नंदकुमार देवढे हे होते.
यावेळी प्राचार्य देवढे यांनी संस्थेच्या १०६ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. “रयत शिक्षण संस्था ही केवळ शैक्षणिक संस्था नसून, सामाजिक न्याय व समानतेची ज्योत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे आज लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या पहिल्या भागात प्राध्यापक राजेंद्र टिळेकर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमागील इतिहासावर प्रकाश टाकला. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी सातारा जिल्ह्यातील काले गावी सत्यशोधक समाजाच्या मेळाव्यात भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी ‘रयत शिक्षण संस्था’ स्थापन करण्याचा ठराव मांडला.
हा ठराव एकमताने मंजूर झाला आणि त्याच दिवशी संस्थेची पायाभरणी झाली. अस्पृश्यता, जातीव्यवस्था व आर्थिक विषमतेविरुद्ध लढत भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचे दरवाजे उघडले.
सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनीही कर्मवीरांना त्यांच्या कार्यात साथ दिली असे टिळेकर यांनी सांगितले.यानंतर राजेंद्र चांदे लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा,यांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय रचनेवर भाष्य केले. रयत शिक्षण संस्थेचा विविध क्षेत्रातील विस्तार या विषयी माहिती त्यांनी नमूद केली.
संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार असून, विविध विभागीय समित्यांद्वारे प्रशासन चालवले जाते. असे सांगितले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे हे डॉ. सुजित गुंजाळ सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था यांच्या विशेष आमंत्रणाने विद्यालयात दाखल झाले व वर्धापन दिन व दिवाळीनिमित्त आकाशकंदील बनवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेला भेट देत चिमुकल्यानं केलेल्या कलाकृतीचे कौतुक केले.
“कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक ध्येयाने प्रेरित होऊन अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देतात. दिवाळीच्या निमित्ताने हे कंदील सामाजिक जागरूकतेसाठी उजळा देतील,” असे खासदार भगरे सर म्हणाले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे यांनी केले तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक सुदामराव माळी यांनी मानले.


