विंचूर पत्रकार संघातर्फे अभय पाटील यांचा सत्कार
विंचूर ते केदारनाथ मोटरसायकल प्रवास – ३,६०० किमी अंतर १३ दिवसांत
न्यायभूमी दि.०५, विंचूर (प्रतिनिधी): सुनील क्षिरसागर

विंचूर पत्रकार संघातर्फे लासलगाव (ता. निफाड) येथील अभय पाटील यांचा केदारनाथ मोटरसायकल प्रवासाची यशस्वी पूर्णता केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पत्रकार संघाचे सुनील क्षिरसागर, मच्छिंद्र साळुंके,राजेश भडांगे,जनार्दन चव्हाण, दत्तात्रय दरेकर,संदीप धनवटे,रोहन सरोदे, अशपाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
अभय पाटील यांनी विंचूर ते केदारनाथ (ये-जा) तब्बल ३,६०० किलोमीटरचा मोटरसायकल प्रवास केवळ १३ दिवसांत पूर्ण केला.
एचएफ डिलक्स या साध्या दुचाकीवर त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश,राजस्थान व उत्तराखंड अशी पाच राज्ये पार केली.
या प्रवासादरम्यान १२ रात्री मुक्काम केले असून दररोज सरासरी ४३० किलोमीटर अंतर कापले. रस्त्यात पाऊस,डोंगरातील दरडी,खराब हवामान अशा अडचणी आल्या तरी उत्तराखंड शासनाने रस्ते तातडीने मोकळे केल्याने प्रवास सुरळीत पार पडला.
केदारनाथ धामात पोहोचल्यावर एकादशी निमित्त मंदिरात जवळपास अर्धा तास दर्शन घेण्याचे भाग्य त्यांना लाभले.
“ही संपूर्ण यात्रा केवळ श्री केदारबाबांच्या आशीर्वादामुळे शक्य झाली,” असे पाटील यांनी सांगितले.
प्रवासात पेट्रोलचा खर्च सुमारे ₹७,४१० व चार दिवसांच्या मुक्कामासाठी केवळ ₹२,४०० इतकाच खर्च आला.
गाडीला कुठेही मोठा बिघाड झाला नाही,हे विशेष.प्रवासातील प्रत्येक मुक्काम ठिकाणी हॉटेल,मंदिर किंवा धाब्यांवर ‘भोलेनाथ’चेच दर्शन घडल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला.
या अनोख्या यात्रेनंतर पाटील यांनी पुढील वर्षी काठमांडू येथील पशुपतिनाथ दर्शनासाठी मोटरसायकल प्रवास करण्याचा संकल्प व्यक्त केला असून पुढील ध्येय संपूर्ण भारत मोटरसायकलने फिरण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.



