लासलगाव बसस्थानकातील कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार
विद्यार्थ्यांना तीन तास ताटकळत बसावे लागले
न्यायभूमी लासलगाव (नाशिक) ०५ ऑक्टोबर सुनील क्षिरसागर

लासलगाव बसस्थानकातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी आणि भोंगळ कारभारामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
शुक्रवार सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर लासलगाव–खानगाव मार्गावरील बसची वाट पाहत विद्यार्थी साडेपाच वाजल्यापासून तब्बल तीन तास स्थानकात ताटकळत बसले.
वेळेवर बस न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. लवकर घरी न पोहोचल्याने चिंताग्रस्त पालकांनी संपर्क साधल्यावर मुलं अजूनही बसस्थानकात असल्याचं समजताच, पालकांनी स्थानकावर धाव घेत कर्मचाऱ्यांकडे संतप्त सूर लावले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी थेट बसस्थानकातील कर्मचाऱ्यांना जाब विचारत, “जर बसची व्यवस्था होत नसेल, तर आम्हीच पोलीस व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पोहोचवतो,” अशी ठाम भूमिका घेतली.
त्यानंतरच बसची तात्काळ व्यवस्था करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या गावी पोहोचवण्यात आलं.
या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, लासलगाव आगारातील निष्काळजी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया :
प्रतिक्रिया –
“माझी चारचाकी गाडी नैताळा येथे पाण्यात अडकली असता समोर काही वाहनं बंद पडली. त्या वेळी काही महिला महामंडळाच्या बसला हात दाखवून थांबवत होत्या, पण एकही बस उभी राहिली नाही.
परिस्थिती पाहूनही चालक-वाहक यांना प्रसंगावधान नव्हतं. एवढी बेदरकार वृत्ती का?”
— सुनील क्षिरसागर, विंचूर
प्रतिक्रिया –
वाहनचालकांशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं,
> “आम्हाला वरूनच परवानगी नाही. ठरलेल्या बसथांब्याशिवाय बस उभी करायची परवानगी नाही.”
— बस चालक व वाहक
या घटनेने पुन्हा एकदा राज्य परिवहन महामंडळातील शिस्त व कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे ठरत आहे.



