बळीराजाच्या’सर्जा-राजा’चा पोळा सण राज्यभरात पारंपरिक उत्साहात साजरा
ग्रामीण भागासह शहरांतही बैलांप्रती कृतज्ञता
न्यायभूमी
दि.१०, विंचूर (नाशिक) सुनील क्षिरसागर
श्रावण अमावास्येच्या अर्थात पिठोरी अमावास्येच्या मुहूर्तावर कृषी संस्कृतीचा आत्मा मानला जाणारा ‘बैलपोळा’ सण राज्यभरात पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणाऱ्या मुक्या जनावरांप्रती, विशेषतः बळीराजाचा खरा सोबती असलेल्या ‘सर्जा-राजा’प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा महाराष्ट्रासह विदर्भाच्या सीमावर्ती भागांत मोठ्या दिमाखात पार पडला जातो. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढले असले, तरी बळीराजाने जपलेले बैलांचे अस्तित्व आणि नात्याचा जिव्हाळा आजच्या उत्सवातून ठळकपणे अधोरेखित झाला.
असा सजला ‘सर्जा-राजा’
पहाटेपासूनच शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना नदी व ओढ्यांवर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते. वर्षभराच्या कष्टाने दुखणारे बैलांचे खांदे हळद आणि तुपाने शेकण्यात येते (‘खांद शेकणे’). आरोग्य उत्तम राहावे म्हणून हिंग आणि डिकामिलीचे मिश्रण पाजण्यात येते.
अंगावर गेरूचे ठिपके, पाठीवर रंगीबेरंगी नक्षीदार झूल, शिंगांवर चमचमते बेगड, डोक्यावर बाशिंग, गळ्यात घुंगूरमाळा आणि पायांत चांदीचे वा करदोड्याचे तोडे अशा थाटात बैलांचा साजशृंगार आपल्या अयपतीनुसार करण्यात येते.
तोरण तुटले अन् पोळा फुटला
सायंकाळच्या सुमारास वाजंत्री, ढोल-ताशांच्या गजरात सजवलेल्या बैलजोड्यांची गावातून भव्य मिरवणूक काढली जाते . मारुतीच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून बैलांना देवदर्शन घडवली जाते. काही भागांत मंगलाष्टकांच्या स्वरात बैलांचे लग्न लावण्याची पारंपरिक रीत पार पडली जाते. काही भागात गावाच्या वेशीवर आंब्याच्या पानांचे बांधलेले तोरण गावातील मानवकऱ्यांच्या हस्ते तोडण्याची प्रथा आहे. जल्लोष करुन ‘पोळा फुटला’ जातो.
घरोघरी औक्षण अन् पुरणपोळीचा नैवेद्य
मिरवणुकीनंतर बैलांना घरी आणल्यावर सुवासिनींनी त्यांचे मनोभावे औक्षण करतात. वर्षभर शेतात राबणाऱ्या या सवंगड्याला पुरणपोळीचा गोड नैवेद्य भरवण्यात येतो. ज्यांच्याकडे शेती अथवा स्वतःचे बैल नाहीत, त्यांनी घरात मातीच्या बैलांची विधिवत पूजा करून या कृषी परंपरेचा मान राखला.
घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि पारंपरिक बलुतेदारांचा सन्मान करत हा कृतज्ञतेचा सण सामाजिक ऐक्याच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला.