येवला- लासलगाव मतदार संघातून मुंबई आंदोलकांना जाणार भाकरी आणि भाजी
येवला आणि लासलगाव मतदारसंघातील सकल मराठा समाजाची नुकतीच भरवस फाटा येथे एक महत्त्वाची नियोजन बैठक
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि.२५ ऑगस्ट अभय पाटील
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या आंदोलनात सहभागी होणाऱ्या लाखो मराठा बांधवांसाठी,विशेषतः ‘एक भाकर समाजासाठी’ या अनोख्या उपक्रमातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे.
येवला-लासलगाव मतदारसंघातही या उपक्रमाला प्रचंड पाठिंबा मिळत असून,मराठा समाजबांधवांनी एकत्र येत आंदोलनाचे यशस्वी नियोजन केले आहे.
येवला आणि लासलगाव मतदारसंघातील सकल मराठा समाजाची नुकतीच भरवस फाटा येथे एक महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली.या बैठकीत मुंबईतील आंदोलनासाठीच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या बांधवांना कोणत्याही परिस्थितीत उपाशी राहावे लागणार नाही,याची काळजी घेण्यासाठी ‘एक भाकर समाजासाठी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत गावागावातून भाकरी आणि चटणी/भाजी गोळा करून मुंबईत आंदोलस्थळी पाठवण्यात येणार आहे.

या बैठकीत शाहूराजे शिंदे,सचिन आहेर,प्रवीण कदम,शिवा सुराशे,गोपीनाथ ठुबे, केदार नवले, प्रसाद फापाळे,पंडित मुदगुल,राकेश फापाळे, पवन फापाळे,विक्रम शिंदे,दत्ता दरेकर,अभिजीत डुकरे,अमित मुदगुल,संदीप फापाळे,केदार फापाळे,योगेश भोसले, हर्षल काळे,तुषार थेटे,विजय मुदगुल यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.
सर्वांनी एकमताने जरांगे पाटील यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी ‘एक मराठा,लाख मराठा’ आणि ‘चलो मुंबई‘ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट पासून सर्व तालुक्यातून जमा झालेल्या भाकरी मुंबईकडे रवाना केल्या जाणार आहेत.
हा उपक्रम केवळ जेवणाची सोय नसून, संपूर्ण मराठा समाजाच्या एकतेचे आणि परस्पर सहकार्याचे प्रतीक आहे.
‘पाटलांनी सांभाळावं मराठ्यांना आणि मराठ्यांनी सांभाळावं पाटलांना’ हा संदेश देत समाजातील प्रत्येक व्यक्ती या आंदोलनाचा एक अविभाज्य भाग बनत आहे.
हा उपक्रम हा फक्त एक भाकरी देण्याचा नव्हे, तर आपल्या बांधवांच्या लढ्याला भावनिक आणि नैतिक पाठिंबा देण्याचा प्रयत्न आहे.ही वेळ एकजुटीची असून,आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढा देण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळते आहे.
या सामूहिक प्रयत्नांमुळे मुंबईतील आंदोलनाला नक्कीच बळ मिळेल आणि मराठा समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



