गोंदेगाव-जऊळके रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत
न्यायभूमी न्यूज
न्यायभूमी
निफाड ( गोंदेगाव ) :- दि.२९ सप्टेंबर सुनील क्षीरसागर
निफाड तालुक्यातील गोंदेगाव-जऊळके या रस्त्यावरील पूल मुसळधार पावसाच्या तडाख्याने वाहून गेला आहे.
त्यामुळे या मार्गाने शाळा,बाजारपेठ तसेच दैनंदिन कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले आहेत.
मात्र सर्वात मोठी अडचण शाळकरी मुलांना सहन करावी लागत असून रोज सकाळी शाळेत जाण्यासाठी व संध्याकाळी घरी परतण्यासाठी त्यांना पाण्यातून जीव धोक्यात घालून जाण्याची वेळ आली आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,या पुलावर बराच काळ दुरुस्तीचे काम झालेले नाही. पावसाचे पाणी वाढल्याने पूल कमकुवत झाला व अखेर पूर्णपणे वाहून गेला.
परिणामी विद्यार्थ्यांसह शेतकरी, महिला व वयोवृद्ध यांची गैरसोय झाली आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शाळकरी मुलांचे हाल तर अधिकच गंभीर झाले आहेत. चिमुकले शालेय गणवेशात व दप्तर पाठीवर घेऊन पाण्यातून ओलांडताना दिसतात. तरी पावसाच्या वेळी अचानक पाण्याचा वेग वाढण्याची भीती कायम असते. त्यामुळे अपघाताचा धोका टळत नाही.
“दररोज मुलांना शाळेत पाठवताना भीती वाटते. त्यांचे जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी त्यांना जावे लागते ही पालकांसाठी अत्यंत वेदनादायक वेळ आहे,” असे एका पालकाने व्यथा मांडली.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालून या पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे.तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी होत आहे.
“आम्ही वारंवार निवेदन दिले तरी प्रतिसाद नाही. मुलांच्या सुरक्षिततेकडे कोणी लक्ष देणार का?” असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.
दरम्यान,जर त्वरित उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थ मोठ्या आंदोलनाचा इशारा देत आहेत.


