विंचूर येथे अबॅकसच्या राज्य पातळीवर विद्यार्थ्यांचा गुणगौरव
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
विंचूर (नाशिक): दि.१७ जानेवारी सुनिल क्षिरसागर

विंचूर येथील श्री स्वामी समर्थ अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अबॅकस परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
संस्थेच्या ५० विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य गुणगौरव सोहळा विंचूर येथील वेदांत हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
’आय जिनिअस’ तर्फे सप्टेंबर २०२५ मध्ये राष्ट्रस्तरीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अबॅकस परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये श्री स्वामी समर्थ अकॅडमी, विंचूरचे एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
विशेष अभिमानाची बाब म्हणजे, या सर्व ५० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत पुढील राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) मोहन पाटील, नांदुर्डी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक जनता विद्यालयाचे प्राचार्य -भाऊसाहेब दगूजी म्हसकर सर, देवेंद्र अजित दराडे- उपप्राचार्य एस एन जे बी नेमिनाथ नगर चांदवड, संग्राम राजाराम सानप- अध्यक्ष सायन्स टीचर्स असोसिएशन येवला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आणि पत्रकार सुनिल क्षिरसागर, अभय पाटील,रोहन सरोदे आदी मान्यवरही उपस्थित होते.

प्रारंभी आयोजकांच्या वतीने सर्व पाहुण्यांचा शाल,गुलाबपुष्प व भेटवस्तू म्हणून पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्याचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सचिन कामडी व मोनाली कामडी यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल शिंदे आणि आभारप्रदर्शन मोनाली कामडी यांनी केले.
यावेळी पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



