न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २६ जुलै अभय पाटील
धारणगाव खडक ता.निफाड येथील अकरावड वस्तीवर मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तीन झोपड्या भस्मसात झाल्या.
गोविंद चंद्रभान माळी, भाऊसाहेब विश्वनाथ वाघ,आणि दगुबाई श्रीहरी माळी या आदिवासी कुटुंबांच्या झोपड्यांचे पूर्णतः नुकसान झाले असून,लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दि.२३ जुलैच्या रात्री सुमारास सुमारे एक वाजता ही दुर्घटना घडली.अकरावड वस्तीवर अचानक आग भडकली आणि काही क्षणांतच तीनही झोपड्या जळून भस्मसात झाल्या.
कुटुंबांनी जिवाच्या आकांताने स्वतःचा जीव वाचवला,मात्र घरात असलेले धान्य,कपडे,भांडी, किराणा,दागदागिने आणि संसाराचा प्रत्येक कोपरा आगीत विरघळून गेला.
आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पो.पा.राहुल सोनवणे,लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी सागर आरोटे आणि तलाठी कमलेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या दुर्घटनेमुळे सदर कुटुंबांचे आभाळच कोसळले असून ते आत्ता उघड्यावर राहत आहेत.तातडीने मदतीची गरज असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



