विंचूरच्या’श्रीराम चौकात’प्रवाशांचे हाल;उन्हाचा तडाखा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
विंचूर (नाशिक) दि.११ एप्रिल सुनील क्षिरसागर

विंचूर नाशिक-संभाजीनगर महामार्गावर विंचूर येथील तीन पाटी (श्रीराम चौक) भागात सध्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मात्र, या विकासकामाच्या गडबडीत सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सुविधेचा पूर्णपणे विसर पडल्याचे चित्र दिसत आहे.
महामार्गावर सध्या कामामुळे उभे राहण्यासाठी जागा नसल्याने आणि सावलीचा आधार नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
एकेरी वाहतूक आणि अपघाताची भीती
सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने चार पदरी वाहतूक थांबवून केवळ एका बाजूने वाहतूक वळवण्यात आली आहे.यामुळे श्रीराम चौकात प्रचंड गर्दी होत असून,प्रवाशांना उभे राहण्यासाठी साधी जागाही शिल्लक राहिलेली नाही.
भरधाव वाहनांच्या वर्दळीत रस्त्यावर उभे राहणे धोक्याचे बनले असून, एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रवाशांना उन्हाच्या झळा
एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना, दुसरीकडे प्रवाशांसाठी या चौकात कोणताही निवारा उपलब्ध नाही.लहान मुले,वृद्ध,अपंग आणि आजारी प्रवाशांना तासन्तास रणरणत्या उन्हात उभे राहावे लागत आहे.बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांचे हाल अधिकच वाढत आहेत.
महिलांची कुचंबणा:प्रसाधगृहाचा अभाव
सर्वात गंभीर बाब म्हणजे,तीन पाटी परिसरात महिलांसाठी साधे स्वच्छतागृह किंवा शौचालय उपलब्ध नाही. दूरवरून येणाऱ्या महिला प्रवाशांची यामुळे मोठी कुचंबणा होत आहे. परिसरात सुविधा नसल्याने महिलांना उघड्यावर जावे लागते,ही अत्यंत संतापजनक आणि मानहानीकारक बाब असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
बसस्थानकात बस नेणे अनिवार्य करा: महामार्गावर उभे राहणे धोक्याचे असल्याने सर्व बसेस (एसटी) मुख्य बसस्थानकात नेण्यात याव्यात, जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी बसता येईल.
तात्पुरता निवारा: जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रवाशांसाठी शेड किंवा सावलीची व्यवस्था करावी.
स्वच्छतागृहाची सोय: श्रीराम चौक परिसरात महिलांसाठी तातडीने फिरते शौचालय किंवा कायमस्वरूपी प्रसाधनगृह उभारण्यात यावे.
”रस्त्याचे काम होणे गरजेचे आहेच, पण प्रशासनाने प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये. महिलांची होणारी गैरसोय पाहवत नाही. तातडीने सर्व बस बसस्थानकात जाणे गरजेचे आहे.”
— विंचूर पंचक्रोशीतील नागरिक
आता या प्रश्नावर प्रशासन आणि परिवहन विभाग काय पाऊल उचलते,याकडे संपूर्ण विंचूरकरांचे लक्ष लागले आहे.



