लासलगाव जवळ पिंपळगाव नजीकच्या पुलाची दुरवस्था; शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास!
न्यायभूमी संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
लासलगाव दि.०४ जुलै कैलास उपाध्ये
येथील पिंपळगाव नजीक भागात असलेल्या स्मशानभूमी जवळील पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून, हा पूल सध्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
दररोज जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षे उलटूनही या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासन आणि संबंधित बांधकाम विभागाला आतापर्यंत अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत.
मात्र,प्रशासनाकडून वर्षानुवर्षे यावर कोणतीही ठोस दखल घेतली गेलेली नाही. “जर भविष्यात येथे एखाद्या शालेय विद्यार्थ्याचा किंवा नागरिकाचा अपघात होऊन जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
दुसरीकडे, स्थानिक राजकीय नेत्यांनीही सध्या या समस्येकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. “आमचा कार्यकाळ संपला आहे,” असे सांगून लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे.
लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेमुळे जनतेत मोठी नाराजी असून, येत्या काळात निवडणुकांच्या माध्यमातून जनता अशा नेत्यांना निश्चितच जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन या पुलाचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



