विंचूर नगरीत श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न;भक्तांची अलोट गर्दी
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
विंचूर दिनांक.२० जुलै प्रतिनिधी रोहन सरोदे

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) येवला आणि हरे कृष्ण भक्तवृंद विंचूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,१९ जुलै २०२६ रोजी विंचूर (ता.निफाड, जि. नाशिक) येथे भव्य ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे’ अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थिती लावून भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी २:३० वाजता विंचूर येथे भगवान जगन्नाथांच्या भव्य महाआरतीने झाली.
महाआरतीनंतर दुपारी ३:०० वाजता मुख्य रथयात्रा महोत्सवास मोठ्या थाटामाटात प्रारंभ करण्यात आला.’हरे कृष्ण हरे कृष्ण,कृष्ण कृष्ण हरे हरे…’ या महामंत्राचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या तालावर विंचूर नगरी दुमदुमून गेली होती.
भगवान जगन्नाथ,बलदेव आणि सुभद्रा मैया यांच्या मूर्तींनी सजलेला हा दिव्य रथ विंचूरमधील प्रमुख मार्गांवरून फिरवण्यात आला.
रथयात्रेची सुरुवात बजरंग गल्ली येथून झाली. त्यानंतर खाडे गल्ली – निलेश गायकवाड वेस – आंबेडकर वेस – तीन पाटी मार्गे जात यात्रेचा समारोप राम मंदिर येथे करण्यात आला.
संपूर्ण मार्गभर भाविकांनी रथाचे स्वागत केले आणि दोरी ओढून पुण्य पदरात पाडून घेतले.
रथ यात्रेचा समारोप झाल्यानंतर सायंकाळी ७:३० वाजता सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.राम मंदिर व शनी मंदिर या ठिकाणी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
”रथयात्रा काळात रथावर आरूढ असलेल्या श्री जगन्नाथ भगवंतांचे जे कोणी दर्शन घेतात,त्यांना भौतिक जगात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही,” या श्रद्धेने हजारो अबालवृद्धांनी या रथयात्रेत सहभाग नोंदवला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी इस्कॉन येवला आणि हरे कृष्ण भक्तवृंद विंचूरच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.



