राजस्थान अधिवेशनात संदीप काळे यांचे सरकारला थेट आव्हान
पत्रकारांच्या हक्कांसाठी बुलंद हुंकार
न्यायभूमी न्यूज
जयपूर | दि. ३० जुलै २०२५
राजस्थानातील झोटवाडा येथे झालेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात संस्थेचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा लागू करण्याची जोरदार मागणी केली.

हजारो पत्रकारांच्या उपस्थितीत झालेल्या या अधिवेशनात काळे यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला — “आम्ही कोणतीही निवडणूक जिंकायला आलेलो नाही.
आम्ही पत्रकार आहोत… आणि आमची ‘लेखणी’च आमचं अस्त्र आहे!”
यावेळी बोलताना त्यांनी पत्रकारांच्या समस्यांवर थेट आणि आक्रमक भूमिका मांडली.त्यांनी सांगितले की, सध्या पत्रकारांवर वाढत्या धमक्या,खोटे गुन्हे,पोलिसी दडपशाही आणि आर्थिक असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने पत्रकार संरक्षण कायदा लागू केला पाहिजे.
या कायद्यात विशेष न्यायालय, तत्काळ FIR, आणि साक्षी संरक्षण यांसारख्या तरतुदी असाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांसाठी पेन्शन व आरोग्य विमा योजना लागू कराव्यात, अशी मागणी करताना काळे म्हणाले, “बिहारमध्ये पत्रकारांना दरमहा ₹१५,००० पेन्शन दिली जाते,तर त्यांच्या पत्नी/पतीला मृत्यूनंतर ₹१०,०००. मग राजस्थान मागे का?” त्यांनी ही योजना तातडीने लागू करण्याची मागणी केली.
तसेच,पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ₹१० लाखांचा आरोग्य विमा सरकारने मोफत द्यावा, अशीही भूमिका त्यांनी मांडली.
काळे यांनी डिजिटल पत्रकारितेच्या वाढत्या प्रभावाला मान्यता देण्याची गरज अधोरेखित केली. “YouTube, पोर्टल्स, सोशल मीडिया या माध्यमांमध्ये हजारो पत्रकार रात्रंदिवस काम करत आहेत.
त्यांनाही मान्यता,ओळखपत्र, जाहिराती आणि संरक्षण मिळाले पाहिजे,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.
तसेच,पत्रकारांच्या समस्यांसाठी “राज्य पत्रकार आयोग”स्थापन करणे, प्रादेशिक व ग्रामीण पत्रकारांसाठी घरकुल योजना,पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक सवलती,आणि महिला पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे प्रस्तावही त्यांनी सादर केले.
या अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने १३ सूत्रीय ठराव मंजूर करण्यात आले,जे लवकरच मुख्यमंत्री आणि माहिती विभागासमोर सादर करण्यात येणार आहेत.
“जर हे ठराव मान्य झाले नाहीत,तर आम्ही आंदोलनाची दिशा स्वीकारू,”असा स्पष्ट इशारा काळे यांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकारांनी “पत्रकार झुकेगा नहीं!”आणि “व्हॉईस ऑफ मीडिया जिंदाबाद!”या घोषणा देत संदीप काळे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला.
या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष गोपाल गुप्ता,आनंद गुप्ता,मंजू शर्मा,राजेंद्र शर्मा,नरेश जाजू,प्रतीक जैन,बाबूलाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.