
विंचूर (नाशिक) : गौरी गणपती हे व्रत तीन दिवसाचे भाद्रपद महिन्यात हिंदू धर्मानुसार स्त्रिया मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात.

विंचूर येथील क्षिरसागर कुटुंबातील जेष्ठा गौरी- गणपती (महालक्ष्मी) चे व्रत तीन दिवसाचे भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर हे व्रत एक सण म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्रात गौरी पूजन विधी वेगवेगळ्या रूढी परंपरेनुसार त्या-त्या पद्धतीने करण्यात येतात असे दिसून येते.
आगमनाच्या दिवशी या गौरीच्या मुखवट्याची पूजन करून घंटानाद करत पाच सुवासिनींनी औक्षण करून लक्ष्मीला घरात आणले जाते.
नंतर पंचांग मुहूर्ता नुसार संध्याकाळपर्यंत त्यांना सजून साडी- चोळी,दाग- दागिने घातले जाते. ह्या पहिल्या आगमनाच्या दिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो.
दुसऱ्या दिवसी म्हणजे गौरी पूजनाचा असतो. सकाळी गौरीचे पूजन करून घरात फराळाचे पदार्थ करंज्या, पुर्या, लाडू अशा प्रकारे इतर पदार्थ करून या गौरी पुढे ठेवून त्याचा नेवेद्य दाखवला जातो.
तसेच पुरणपोळी,सोळा भाज्या,पानाचा विडा अशाप्रकारे विविध प्रकारचा नैवेद्य दाखवून व दोन सुवासिनी यांनाही जेऊ घालतात.त्यांना देवी रूप मानून त्यांचा आदर करून त्यांची ही पूजा केली जाते.
नंतर आरत्या केल्या जातात व संध्याकाळी हळदी- कुंकूचा गौरी दर्शनाचा कार्यक्रम ठेवला जातो.
सासरी गेलेल्या मुलींना या कार्यक्रमानिमित्त माहेरी आणतात व रात्री अगदी आनंदमयी वातावरणात भजने,गौरी चे गाणे म्हणत जागरण केले जाते.
तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जनाचा म्हणजे दुःखाचा व उदासिनतेचा दिवस या दिवशी दही-भाताचा नैवेद्य दाखवून आरत्या करून परत पाच सुवासिनी यांच्या हातून गौरी उठवतात.
या आलेल्या स्त्रियांना फुटाणे वाटले जातात, नंतर नदीवर विसर्जन केले जाते.



