अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे नुकसान भरपाई मिळावी
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.०६ एप्रिल निशिकांत पानसरे
काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस तसेच जिल्ह्यातील काही भागात गारपीट सुरू आहे.
काढणीला आलेल्या कांदा,गहू, हरभरा,द्राक्ष, भाजीपाला पिके तसेच इतर सर्वच पिकांचे या अवकाळी मुळे अतोनात नुकसान झाले.
शेतीचा वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता काढणीच्या अवस्थेत झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.नाशिक जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा असून या जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे.
सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत देण्यात यावी त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या बँकांची कर्ज वसुली थांबवण्यात यावी याशिवाय अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कर्जमाफी योजना विचारात घ्यावी.
यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रसिद्ध कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच उपाययोजना त्यांच्यासमोर मांडल्या.
सदर निवेदनाची प्रत ही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक यांना पाठवली आहे.
शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत न केल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देखील होळकर यांनी या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना दिला.