मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई नाका व द्वारका सर्कल परिसराची पाहणी सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
नासिक दि १४ जून विशेष प्रतिनिधी सुनील क्षीरसागर
नाशिक शहरातील मुंबई नाका व द्वारका सर्कल येथे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत.
अशी स्पष्ट सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिली.
यासाठी सिग्नल यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करून पोलीस,महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संयुक्तपणे समन्वय साधावा,असे आदेशही त्यांनी दिले.

मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मुंबई नाका व द्वारका सर्कल परिसराची पाहणी करून तेथील वाहतुकीची स्थिती प्रत्यक्ष पाहिली.
या दौऱ्यात म्हाडा सभापती व शहराध्यक्ष रंजन ठाकरे,पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, महापालिकेचे अभियंता संजय अग्रवाल,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दिलीप पाटील, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, नाना पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, “हाजी अली परिसरात यशस्वी ठरलेली सिग्नल यंत्रणा नाशिकमध्येही अंमलात आणावी.
सिग्नलवर नियंत्रण राहील आणि वाहतूक विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्या. नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करताना इतरांची गैरसोय होणार नाही याची दक्षता बाळगा.”
त्यांनी पुढे सांगितले की, सिग्नल चौक, रस्ते आणि आजूबाजूचा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावा.तसेच रस्त्याच्या कडेला वाहने थांबवणाऱ्यांविरुद्धही कठोर कारवाई करावी.
भुजबळांनी अधिकाऱ्यांना उद्देशून खडसावले की, “गेल्या वर्षभरात मुंबई नाका आणि द्वारका सर्कल परिसरातील अतिक्रमण,फेरीवाल्यांची गर्दी आणि अस्वच्छतेबाबत अनेकदा सूचना देऊनही कामांमध्ये दिरंगाई दिसत आहे.
लहानसहान कामांसाठीही वेळकाढूपणा चालत नाही.”
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या भागातील अतिक्रमण तात्काळ हटवावे,फेरीवाल्यांचे स्थलांतर करावे आणि परिसरात शिस्त व स्वच्छता राखावी.
नाशिक मनपा व पोलीस प्रशासनाने यावर गंभीरतेने कार्यवाही करून ठोस बदल घडवावा.