विंचूर येथे अंगणवाडीत’अन्नप्राशन’सोहळा उत्साहात; ६ महिने पूर्ण झालेल्या बालकांना दिला पूरक आहार
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
विचूर दि.०९ फेब्रुवारी सुनील क्षिरसागर
एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत,विंचूर येथील राजवाडा अंगणवाडी केंद्र क्रमांक ६०८ मध्ये ‘सामुदायिक आधारित कार्यक्रम’ (CBE) अंतर्गत शनिवारी अन्नप्राशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.बाल विकास प्रकल्प अधिकारी आरती पाटील व पर्यवेक्षिका वंदना खांदवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विंचूरचे सरपंच सचिन दरेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुनील क्षिरसागर उपस्थित होते.
सकस आहारातून सुदृढ पिढीचा संकल्प
सहा महिने पूर्ण झालेल्या बाळाला आईच्या दुधासोबतच बाह्य पूरक आहाराची अत्यंत गरज असते.याविषयी मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की,बाळाला आता वरण-भात, खिचडी, विविध भाज्यांचे सूप,फळांचा रस आणि नाचणीची पेज यांसारखा मऊ व सैलसर आहार सुरू करणे आवश्यक आहे.
हा आहार देताना स्वच्छतेची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.आईने बाळाचा आहार शिजवण्यापूर्वी आणि भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत,जेणेकरून बाळाला जंतूसंसर्ग होणार नाही आणि त्याची शारीरिक व मानसिक वाढ उत्तम होईल.
या बालकांचे झाले अन्नप्राशन
कार्यक्रमात राधिका जोशी व शितल पवार यांच्या बालकांना मान्यवरांच्या हस्ते अन्नप्राशन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी अंगणवाडी सेविका मनीषा जंगम, वैशाली चव्हाण,स्मिता काळे,शिवकन्या जंगम, सोनाली शिरसाठ,सुवर्णा दरेकर,रूपाली साळुंखे यांनी नियोजनात सहभाग घेतला.

याप्रसंगी परिसरातील लाभार्थी महिला,गरोदर माता,किशोरी मुली आणि संजीवनी बागले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंगणवाडीच्या या उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले आहे.



