शेतकरी बांधवांनी पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनाकडे वळावे – कांदा धोरण समितीत सौ.सुवर्णा जगताप यांचे आवाहन
न्यायभूमी न्यूज
न्यायभूमी
विचूर दि.३० सप्टेंबर सुनील क्षिरसागर
राज्यातील कांद्याच्या बाजारभावात स्थिरता राखणे, शेतकरी–ग्राहक–व्यापाऱ्यांचे हितसंबंध संतुलित ठेवणे आणि निर्यातक्षम कांदा उत्पादन वाढवणे या उद्देशाने राज्य शासनाच्या कांदा धोरण समितीची चौथी बैठक मंगळवार, दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी येथे पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा.पाशा पटेल होते.
बैठकीत कांद्याचे उत्पादन, साठवणूक,विक्री व्यवस्थापन,निर्यात धोरण आणि भाव नियंत्रण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती व कांदा धोरण समितीच्या सदस्य सौ.सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडत पांढऱ्या कांद्याच्या लागवडीवर भर देण्याचे आवाहन केले.
त्या म्हणाल्या,“राज्यात लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी निर्यातक्षम व साठवणुकीला टिकणाऱ्या पांढऱ्या कांद्याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही पांढऱ्या कांद्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शाश्वत नफा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनाचा गांभीर्याने विचार करावा.”
तसेच, पांढऱ्या कांद्याच्या लागवडीसाठी शासनाकडून विशेष मार्गदर्शन व सहाय्ययोजना राबविण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून संशोधन व उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव असल्याचे त्या म्हणाल्या.
या बैठकीस कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कांदा व्यापारी संस्था,शेतकरी प्रतिनिधी तसेच कांदा निर्यातदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांद्याच्या उत्पादनात वैविध्य आणून राज्याला स्पर्धात्मकता आणि टिकाव मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना आखण्यात आल्या.